श्रीक्षेत्र वडवळ येथील हे पवित्र खर्गतीर्थ होय. काशीहून पवित्र पाणी येथील खर्गतीर्थात येते. अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री नागनाथानी आपल्या हातातील खडगाच्या सहाय्याने या खर्गतीर्थाची निर्मिती केली, असा उल्लेख येथील ग्रंथात आढळतो. श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिमेला ओढ्यालगत सुरेख बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे खर्गतीर्थ भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रींच्या वार्षिक यात्रेतील तेल लावणे, खर्ग, गण हे सोहळे याठिकाणी होतात. पूर्णतः दगडी बांधकाम असलेल्या या खर्गतीर्थात सुरेख पायऱ्या आहेत. मध्यभागी दगडी चबुतरा असून भाविक त्याला ‘बिंडा’ म्हणतात. यात्रेतील ‘खर्ग’ व ‘गण’ या सोहळ्यात या बिंडावरच गुरु-शिष्यांची कडकडून भेट होत असते. खर्गतीर्थात भक्तांना बसण्यासाठी २१ ओवऱ्या आहेत. ठिकठिकाणी विविध देव-देवतांची मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. श्री नागनाथभक्त अज्ञानसिद्ध यांनी याच ठिकाणी तपश्चर्या केलेली छोटीशी गुहा देखील या ठिकाणी आहे. या गुहेच्या प्रवेशद्वारातच माता जगदंबा हिंगुला, बगला यांची मूर्ती आहे. नवरात्रौत्सवात महिला मोठ्या भक्तिभावाने इथे दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर खर्ग सोहळ्याच्या आदल्या दिवशी गावातील सर्व महिला रात्री याच खर्गतीर्थात स्नान करून श्रींच्या मंदिरात दंडवत घालत श्रींचे मनोभावे दर्शन घेतात.
श्री नागनाथ मंदिराच्या पूर्वेला हनुमान मंदिराच्याजवळ भक्त बहिरंभट यांची संजीवन समाधी असून त्यांना कुटण्यात आलेले उखळ हे खर्गतीर्थाजवळ आहे. उखळ व समाधी यांचा खूप जवळचा संबंध आहे. भक्त बहिरंभटांना याच उखळाच्या ठिकाणी दिव्यज्ञानाची प्रचिती झाली… हे झाले कसे? पैठण येथे बहिरंभट नावाचे वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण राहत होते. एके दिवशी जेवताना भाजीत मीठ कमी असल्याचे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. यावर त्यांच्या पत्नी म्हणाल्या, “तुम्ही इतके ज्ञानी आचारवंत आणि भाजीत मीठ कमी आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटले. या तुमच्या जीभेमुळे असे होत असेल तर नाथा मी काय सांगू? तुम्ही मिठामुळे खंत वाटून घेता, मग साधुसंत कसे झाले असतील ते तरी मला सांगा नाथा.” या आशयाचे बोलणे ऐकून त्यांचे मन परिवर्तीत झाले. आपण अजूनही किरकोळ गोष्टीत अडकून पडलो आहोत, मग आपल्याला ज्ञानप्राप्ती कुठे झाली ? आपल्या पत्नीने आज आपल्याला जागे केले म्हणून तिलाच गुरू मानून तिच्या पायावर डोके ठेवून सद्गुरुंच्या शोधार्थ बाहेर पडले. मार्ग मिळेल तिथे जाऊ लागले व प्रत्येकाला “मला देवाला भेटायचे आहे, मला देवाची गाठ घ्यायची आहे, कुणी गाठ घालून देईल का?” असे विचारू लागले.
मात्र त्यांचे समाधान कोणी केले नाही. असेच फिरत असताना त्यांना एकदा इस्लाम धर्मातील काझी, मौलवी भेटले व त्यांनाही बहिरंभटांनी हाच प्रश्न विचारतात. त्यांनी सांगितले, “आधी तुम्ही मुसलमान व्हा, मग तुमची देवाशी भेट घडवून आणू” असे सांगितले. हे ऐकून बहिरंभटांनी धर्मपरिवर्तन केले. सर्व विधी देखील त्या धर्माप्रमाणे केले. नमाज पठण, कुराण वाचन सर्व केले, मात्र लहानपणापासून हिंदू धर्मपद्धतीनुसार सवय लागली होती. त्यामुळे त्यांचे नमाज पठणात मन रमेना. ते पुन्हा हिंदू धर्मात आले. मात्र आता हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही धर्माच्या खुणा त्यांच्या शरीरावर होत्या, कानाला छिद्रे होती व सुन्ता देखील केलेली होती. आता त्यांना दुसरा प्रश्न पडला, मी हिंदू की मुसलमान ? मग मला देवाची गाठ कशी पडणार ? पुन्हा सद्गुरुच्या भेटीसाठी ते सर्वत्र फिरू लागले. फिरत फिरत त्यांना समजले की, “वडवळ येथे सिद्धपुरुष आहेत, तेच आपले समाधान करतील.” मग त्यांनी वडवळ येथे जाण्याचा निश्चय करीत हे गाव गाठले.
इथे आल्यानंतर त्यांनी पाहिले की, एका झाडाखाली एक सिद्धपुरुष बसले आहेत, भोवती भक्तगण आहेत. इतक्यात ‘त्या सिद्धपुरुषानी सरकाळीचा गाडा तयार केला त्याला मुंगळे जुंपले व मोठ मोठे दगड त्यावर ठेवले आणि सर्पाचा चाबूक घेऊन तो गाडा चालवू लागले.’ हे पाहून बहिरंभटांना मनोमन खात्री पटली, हे सिद्धपुरुष नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील. त्यांनी श्री नागनाथांचे चरण धरत विचारले, “सांगा मी कोण आहे? मी हिंदू का मुसलमान ? माझा देव कुठे, कसा भेटेल ? मला माझेच कळेना मी कोण आहे?’ श्रींनी त्यांच्याकडे पाहिले व शिष्यांना आज्ञा केली. भक्त एकलिंगाने बहिरंभटचा शिरच्छेद केला व शिष्यांनी उखळात बहिरंभटांना टाकून कुटण्यास सुरुवात केली. त्यांचा मांसाचा एक गोळा बनविला. श्री नागनाथांनी त्या गोळ्यावर अग्निसंस्कार करीत जल शिंपडले. पुन्हा बहिरंभट जिवंत झाले. आता त्यांच्या शरीरावर कोणत्याच खुणा नव्हत्या. ना हिंदू ना मुसलमान ! एकदम स्वच्छ शरीर. श्री नागनाथांनी त्यांना विचारले, ‘आता तूच सांग, तू कोण आहेस ते ?’ बहिरंभटाने आनंदाश्रू आणित श्रींचे चरण धरले. त्याला उठवून त्याच्या सर्वांगाला सद्गुरुंनी स्पर्श केला अन् बहिरंभटांना एक आत्मिक समाधान लाभले. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले. पुढे त्यांनी श्रींचे शिष्यत्व पत्करून याच ठिकाणी त्यांची सेवा केली व समाधी घेतली. यात्रेमध्ये या समाधीवर ‘खर्गाच्या’ दिवशी धान्याची भाकणूक होत असते, तर खर्गतीर्थाजवळ असलेल्या उखळामध्ये रोगराईविषयी भाकणूक होते.
“केला सरकाळीचा गाडा । जुंपुनी तया मुर्कुडा । शीळा प्रचंडा आणिलेसी ।
“सरकाळीचा गाडा करवुनीया वरती । प्रचंड धोंडे रचिले माकोडे पुढती ।
सर्पाचा चाबुक घेऊनिया हाती ।
श्रीक्षेत्र वडवळ येथील सर्व पवित्र स्थळे ही श्री नागनाथांच्या अद्भूत लीलेने निर्माण झालेली आहेत. यातीलच एक स्थान म्हणजे मुंगीचा धोंडा होय. मंदिराच्या दक्षिणेस हे स्थान आहे. श्री नागनाथांनी सरकाळीचा (कडब्याचा) गाडा तयार करून त्याच्यावर प्रचंड वजनाचे धोंडे ठेवले. या गाड्यास मुंगळ्यांना जुंपले व हाती सर्पाचा चाबूक करून या मुंगळ्याकरवी हे धोंडे ओढत याठिकाणी आणले. या ठिकाणास ‘मुंगीचा धोंडा’ असे म्हणतात. श्रींच्या वार्षिक यात्रेत ‘खर्ग’ व ‘गण’ या दिवशी खर्गेमहाराजांच्या हस्ते या ठिकाणी चाऱ्यासंबंधीची भाकणूक पार पडते.
श्रींचे मंदिर देखभाल व भाविकांना वेळोवेळी विविध सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने १९५४ साली श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीची स्थापना करण्यात आली. वर्षभरातील श्रींचे विविध धार्मिक उत्सव याप्रसंगी भाविकांची असणारी उपस्थिती याचा विचार करून त्याबाबतचे नियोजन पंचकमिटी करीत असते. नुकतेच देवस्थान पंच कमिटीने भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ प्रशस्त जागेवर भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले. याठिकाणी वाहन पार्किंग, २४ तास पाण्याची सोय, दोन हॉल, २५ खोल्या उपलब्ध आहेत. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय सध्या होत आहे. देवस्थान पंचकमिटीने इतर गोष्टींचा विचार करून भक्त निवासाच्या पाठीमागे भव्य असे बहुउद्देशीय सभागृह उभारले असून याठिकाणी आता लग्न सोहळे, साखरपुडा, नामकरण आदी उत्सव नाममात्र दरात साजरे करता येणार आहेत. त्यामुळे मुख्य मंदिरामध्ये आता लग्न व इतर सोहळे कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून भाविकांना केवळ दर्शनासाठी हे मंदिर उघडे असणार आहे.
नागेशभक्त श्री एकलिंग तेली व ‘वरदबसवराज’ ह्या दोन शिष्यांनी श्रीक्षेत्र वडवळ येथे श्रींची सेवा करण्यात धन्यता मानून याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली. श्रींच्या आज्ञेनुसार श्री एकलिंग तेली यांनी श्रींचे मंदिर बांधले व याच मंदिरात संजीवन समाधी घेऊन प्रतिवर्षीच्या यात्रेत माझ्या मस्तकावरून श्रींनी पाय देऊन जावे, असा वर मागितला. वरदबसवराज या भक्ताची संजीवन समाधी गावाच्या पश्चिमेला माळावर आहे. पाथर्डी तालुक्यातील नागतळे या ठिकाणी एकलिंग तेली राहात होते. गवंड्याचे काम करून आपला चरितार्थ चालवत. पूर्वसंचिताप्रमाणे याठिकाणी श्रींची त्यांची भेट झाली व श्री नागनाथांचे शिष्यत्व पत्करून एकलिंग तेली त्यांची मनोभावे सेवा करू लागले. तपसाधना करू लागले अन् कालांतराने त्यांना श्रीकृपेने सिद्धी प्राप्त झाली. एके दिवशी तपसाधना करून श्रींच्या दर्शनासाठी जात असताना त्यांना वाटेत ‘एका वाण्याच्या मुलीची प्रेतयात्रा दिसली. तिचे नाव होते ‘वरदम्मा’. यावेळेस अचानक एकलिंग तेली यांना असे वाटले की, खरेच आपली सिद्धी फळाला येतेय का ? आपल्याला खरेच सिद्धी प्राप्त आहे का ? हे पहावे यासाठी त्यांनी त्या प्रेतयात्रेत जाऊन तेथील माती अंगारा म्हणून मृत वरदम्माच्या कपाळी लावत तिला तिच्या नावाने हाक मारली अन् तेवढ्यात ती मृत वरदम्मा जिवंत झाली! सगळ्यांना आश्चर्य वाटू लागले.
एकलिंग तेली यांच्या सामर्थ्याची सर्वांना जाणीव झाली. वरदम्माचे नातेवाईक, घरातील सदस्य तिला घरी चल म्हणून सांगू लागले. मात्र वरदम्माने नकार देत सांगितले, “श्रींच्या कृपेने मला पुन्हा हे जीवदान मिळाले. यापूर्वी मी तुमची होते. मी मृत झाल्यानंतर तुम्ही स्मशानात घेऊन निघाला होता. मात्र आता पुन्हा माझा पुनर्जन्म झाला असून श्रीच माझे वडील आहेत”, असे म्हणून ती भक्त एकलिंगासोबत श्रीच्या दर्शनाला गेली व दोघे तिथेच श्रींची सेवा करू लागले. मात्र ‘व्यक्ती तितक्या प्रकृति’ म्हटल्याप्रमाणे एक स्त्री श्रींच्या सेवेत राहिली आहे या विषयावर उलटसुलट चर्चा घडू लागल्या. श्रींनी अंतर्मनाने हे जाणले. काही दिवसांनी वरदम्माला पोट दिसू लागले. ते हळूहळू वाढल्यानंतर मात्र निंदा करण्यात काही लोक मग्न झाले. मात्र श्रींकडे जाऊन याविषयी बोलण्यासाठी कोणी तयार होईना. मग या ग्रामस्थांनी या प्रकरणाचे खरे-खोटे करण्यासाठी नवनाथांना बोलावण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे नवनाथ आपल्या ताफ्यांसह हिंस्र श्वापदावर बसून श्रींकडे निघाले. ही वार्ता भक्त एकलिंग यांना समजताच त्यांनी श्रींना याबाबत सांगितले. त्यावेळेस एकलिंग भिंत बांधत होते. श्रींनी त्यांना आदेश केला, “तू त्या भिंतीवर बसूनच त्यांना सामोरे जा.” या भिंतीवर बसूनच भिंत चालवत एकलिंग नवनाथांना सामोरे गेले. ते पाहून नवनाथ देखील आश्चर्यचकीत झाले. आपण सजीव प्राण्यावर बसून येत आहोत, मात्र हा तर निर्जीव भिंत चालवून आपल्यासमोर आला आहे. जर हा शिष्य इतका तयार आहे तर याचे गुरु किती सामर्थ्यवान असतील? असा प्रश्न नवनाथांना पडला. नंतर सर्वजण श्रीं समोर गेले. श्रींना नवनाथांच्या येण्याचे कारण माहितच होते. इतक्यात त्याठिकाणी वरदम्मा पाण्याने भरलेली घागर घेऊन आली. श्रींनी तिला सर्वांसमोर तिच्या अंगावरील वस्त्रे काढण्याचे आदेश दिला. वरदम्माने देखील क्षणाचाही विलंब न लावता सर्व वस्त्रे दर केली, तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ती स्त्री नसून पुरुष असल्याचे दिसले. नवनाथांसह सर्वांचेच श्रींनी शंका निरसन केले. सर्वांनी वरदम्माचे नाव बदलून ‘वरदबसवराज’ असे नाव ठेवले. यानंतर श्रींच्या सेवेत काही कालांतराने भक्त एकलिंग तेली व वरदबसवराज वडवळ येथे आले. वरदबसवराज यानी गावाच्या पश्चिमेला माळावर संजीवन समाधी घेतली. प्रतिवर्षी या ठिकाणी तेल लावण्याचा सोहळा पार पडतो. येथील भाविक व तरुण मंडळाच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येतो.
श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिमेला ओढ्याकाठी एक विशाल वटवृक्ष आहे. हे वडाचे झाडच या गावाच्या नावाचे उगमस्थान आहे. श्रीक्षेत्र मोहोळहून श्री नागनाथ आपल्या शिष्यपरिवारासोबत सर्वप्रथम या ओढ्याच्या कडेला असणाऱ्या एका वाळलेल्या वडाच्या झाडाखाली येऊन बसले. श्रींनी आपल्या शिष्याला या वाळलेल्या वडाच्या झाडास पाणी द्यायला सांगितले. शिष्याने पाणी देताच या वाळलेल्या झाडास पालवी फुटली. श्री नागनाथांनी या वाळलेल्या वडाला पालवी फुटवली म्हणून या गावास ‘वडवाळ’ हे नाव पडले. पुढे त्यामुळेच ‘वडवाळसिद्ध नागनाथ’ हे नाव झाले. मात्र नंतर अनेक शतकांनी ‘वडवाळ’ या नावाचा अपभ्रंश होत सध्या शासन दरबारी ‘वडवळ’ हे नाव झाले. श्रीक्षेत्र वडवाळ येथील हा विशाल वटवृक्ष काही वर्षांपूर्वी उन्मळून पडला होता. त्याचे खर्गेमहाराज कै. गणाबुवा शिवपुजे यांच्या हस्ते व खर्गे महाराज कै. नागनाथबुवा शिवपुजे यांच्या उपस्थितीत श्रद्धेने पुनर्रोपण करण्यात आले. आज तोच वटवृक्ष पुन्हा पूर्वीप्रमाणेच मोठ्या आकाराने डौलदार रुप धारण करून आज उभा आहे.
मानूर येथील श्री नागनाथांचा शिष्य श्री एकलिंग तेली हा आपले उर्वरीत आयुष्य श्रीसेवेत घालविण्यासाठी वडवाळ येथे आला व श्रीनागनाथ सेवेत रममाण झाला. एकलिंग तेली याने श्री नागनाथांना वर मागितला की, ‘आपण सुरु केलेल्या उत्सवात प्रतिवर्षी चैत्र शुध्द चतुर्थी व सप्तमी या शुभ तिथीस माझ्या मस्तकावरून जावे.’ श्रीनागनाथांनी श्रीएकलिंग तेली याची मागणी अत्यानंदाने कबुल केली. पुढे श्री एकलिंग तेली याने वडवाळ येथे श्री नागनाथाचे मंदिर स्वहस्ते बांधले व त्या मंदिरासमोरच आपण स्वत: समाधिस्थ झाले आणि त्यांना दिलेल्या वरानुसार आजपावेतो प्रतिवर्षी उत्सवात श्रींचा संचार झाल्यावर ते एकलिंग तेली यांच्या समाधीवरुन जातात. श्री एकलिंग तेली यांची संजीवन समाधी श्रीक्षेत्र वडवाळ येथे श्री नागनाथ मंदिरात आहे.
श्री उध्दवचिद्घन हे सुमारे 1680 च्या सुमारास संतकवी म्हणुन होवून गेले.यांच्या जन्म मोगलाईत ‘धारुर’ या गांवी झाला.त्यांचे मुळ नांव उध्दव व त्यांच्या गुरुचे नाव चिद्घन हे होते.त्यांनी वाड्मयीन सेवा करताना उध्दवचिद्घन हे नाव धारण केले. यांची समाधी श्रीक्षेत्र वडवाळ येथे श्रीनागनाथ मंदिरात आहे.
श्रीनागनाथांनी आपल्या अवतार कार्य समाप्तीचा संकेत दिला त्यावेळी भक्त हेग्रसांना गहिवरुन आले.आज आपली जी स्थिती आहे ही सद्गुरु नागेशांच्या कृपेमुळेच आहे.आपल्या मनातील इच्छेप्रमाणे श्रीनागेशांनी आपल्या आईला दर्शन देऊन कृतार्थ करुन सस्वरुपात मिळविले.त्याप्रमाणे आजपर्यंत मोहोळ व वडवाळवासियांचा व तिमण्णा, बहिरंभठ, एकलिंग तेली यांचा उध्दार केला हे त्यांचे महत्कार्य आपल्या समोरच घडले. अशा सद्गुरुंना गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. त्या शिवाय आपण त्यांचे उतराई होऊ शकत नाही व उतराई होणे आपले कर्तव्यच आहे.असा विचार त्यांच्या मनात सतत घोळू लागला.एके दिवशी श्रीमहाराज खर्गतीर्थावर आले असता हेग्रसांच्या मनात विचार आला की गुरुदक्षिणा काय द्यावी? आपली कायाच (शरीर) त्यांच्या चरणी अर्पण करण्याशिवाय आपल्याजवळ दुसरे काय आहे? तर आपली कायाच त्यांना अर्पण करावी म्हणुन शस्त्राने आपले शिर देहापासून वेगळे करून श्रीमहाराजांना ओवाळिले.
भक्त हेगरस पुर्व मुख उभा राहून | हाती दिव्य खड्ग घेऊन |
आपले शिरकमल उतरवून | देवे ओवाळिले ||
(श्री अज्ञानसिध्द)
हे आपल्या भक्ताचे कृत्य पाहून श्रीनागनाथ महाराज चकीतच झाले.त्यांनी हेग्रसांना मोठा आशिर्वाद दिला. तेथील भक्त गणांनी व ग्रामस्थांनी श्रीहेग्रसांची समाधी श्रीनागनाथांनी भक्त हेग्रसांसाठी गोपाळपूरहून जे श्रीकृष्ण मंदिर आणुन दक्षिण दिशेला ठेवले त्या मंदिरातच बांधली. हे समाधी मंदिर पाहण्यासारखे आहे. या मंदिराचे बांधकाम म्हणजे मोठे मोठे दगड एकमेकांवर रचलेले आहेत. हे दगड बाहेरून ओबड धोबड असुन आतुन खसखसीसारख्या टाकीने सफाईदार केलेले आहेत. बांधकामासाठी चुना किंवा तत्सम कोणताही पदार्थ वापरलेला नाही. थोडक्यात हे समाधी मंदिर म्हणजे बांधकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय.