चैत्र महिन्यातील पौर्णिमेस हनुमान जयंतीस ग्रामदैवत श्री नागनाथांच्या यात्रेस प्रारंभ होतो. हा यात्रेचा कार्यक्रम भक्त हेगरस यांचे वंशज सांगतात. त्यांनी हा क्रमवार तिथीनुसार कार्यक्रम सांगितल्यावर वडवाळ, मोहोळ येथील यात्रा प्रारंभ होते. यादिवशी ‘श्रीस तेल लावणे’ या धार्मिक सोहळ्याने यात्रेची सुरुवात होते. मोहोळ येथील सर्व मानकरी व सेवेकरी मंडळी या दिवशी मोहोळ येथील श्री नागनाथ मंदिर व मानकरी शेटे यांच्या घराजवळ एकत्र येतात. तेथून सर्वजण पहाटे ५ वाजता निघतात. सर्व मंडळी वडवाळ येथे आल्यानंतर शेटे हे मंदिरात जाऊन तैलाभिषेकासाठी लागणारे सर्व साहित्य आहे का? याची तेथील पुजारी व मानकऱ्यांसोबत पाहणी करतात. तेथून ज्या खर्गेमहाराजांचे साल आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिखर शिंगणापूर येथून आणलेली विभूती व दावणा देतात. खर्गे महाराज यांना ही विभूती व दावणा देतात. श्री. शेटे हे दोन्ही खर्गेमहाराजांना एकत्रित घेऊन वाद्यांच्या गजरात मंदिरात आणतात. त्यानंतर दोन्ही खर्गेमहाराज हे मुख्य गाभाऱ्यासमोरील गणमठ येथे बसतात. तेथे मोहोळचे सर्व मानकरी उपस्थित असतात. त्यानंतर शेटे हे वडवाळ येथील मानकरी धनवे, मोरे, मोकाशी, नरळे, कुलकर्णी, गोरे, चौगुले हे हजर आहेत की नाहीत याची चौकशी करतात.
सर्वजण हजर आहेत हे म्हटल्याबरोबर श्री. शेटे हे खर्गेमहाराज व मानकरी यांना श्रीस तेल लावण्यासाठी सर्वांना घेऊन गाभाऱ्यात जातात. तेथे प्रथम खर्गेमहाराज यांच्या हस्ते तुरभूजीवर पाणी घातले जाते. त्यानंतर दही, दूध, केळी, साखर यांचे मिश्रण केलेले घातले जाते. त्यानंतर पाणी घातले जाते. नंतर मानकरी मोहोळकर यांच्या हस्ते श्रींची मूर्ती तुरभूजीवर ठेवली जाते. खर्गेमहाराज गरम पाण्याने मूर्तीवर तांब्याने पाणी घालतात. नंतर मूती बाजूला काढून ठेवली जाते. तूरभुजीवर शेटे हे विभूती टाकतात. त्यानंतर मोहोळकर हे सुगधी तेल घालतात. कुडे, कापूर लावतात. तसेच मोहोळकर यांनी तयार केलेला गंध तभूजीवर लावले जाते. तोच गंध ज्या खर्गेमहाराजाचे साल आहे त्यांना लावला जातो. त्यानंतर श्रींची मूर्ती तुरभूजीवर ठेवली जाते. मूर्तीस श्री खर्गेमहाराज गंध लावतात. सर्व मानकऱ्यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस पागोटे, उपरणे परिधान केले जाते. मोहोळकरांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस बाशिंग बांधले जाते. चाफ्याच्या फुलाचे हार श्रीस घातला जातो, लिंबाची माळ घातली जाते. त्यानंतर खर्गेमहाराजांच्या हातात आरती दिली जाते.
यानंतर कुर्डे यांच्याकडून आरती लावण्यात येते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘अनादी सिद्ध पूर्ण’ या अभंगाची सुरुवात मोहोळकर करतात. नंतर खर्गेमहाराज आरती घेऊन सर्व मानकरी, भाविक, भक्त मंडळींसह गाभाऱ्यात प्रदक्षिणा घालून मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ येतात. कुर्डे यांच्याकडून सर्वांना कपाळी बुक्का लावला जातो. तेथून पुढे गोपाळकृष्ण मंदिर, मारुती मंदिर, बहिरभट समाधी, मुंगीचा धोंडा, बसवराज, खर्गतीर्थ, खंडोबा या सर्व ठिकाणी जाऊन त्या त्या देवतेची आरती करतात. याप्रसंगी सर्वत्र मंगलमय वातावरण असते. संतमंडळींचे टाळांच्या सहाय्याने तल्लीन होत भजन सुरू असते. बैलगाडीमध्ये मंदिरातील मोठ्या नगाऱ्याचे वादन सुरू असते. भाविक सर्वत्र मार्गावर रांगोळीच्या पायघड्या टाकून स्वागत करतात. ठिकठिकाणी सुवासिनी खर्गेमहाराजांचे पाद्यपूजन करतात. सेवाभाव म्हणून ठिकठिकाणी भाविकांसाठी पाणी, दूध वाटप केले जाते. वरदबसवराज या ठिकाणी (माळावर) आल्यानंतर दर्शन घेऊन भाविक काहीकाळ इथे बसतात. ठिकठिकाणी अशी आरती झाल्यानंतर सर्वजण मंदिरात येतात.
खर्गेमहाराज आरती घेऊन एकलिंग तेली यांच्या समाधीजवळ उभे राहतात. तेथे श्री नागनाथांची आरती म्हटली जाते. आरती झाल्यावर मानकरी मोहोळकर, कुर्डे इतर मानकरी, भक्तमंडळी बसतात या ठिकाणी शेटे हे अभिषेकाचे तीर्थ तांब्यामध्ये घेऊन येतात. प्रथम मोहोळकर, कुर्डे व नंतर इतर भक्तमंडळींना हे तीर्थ वाटप करतात. त्यानंतर शेटे हे मोहोळकर यांना पुढील खर्ग, गण हे कार्यक्रम कधी असे विचारतात. त्यानंतर मोहोळकर हे खर्ग-गण केव्हा हे सांगतात. मग शेटे हे सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात सांगतात. त्यानंतर हेगरस घराण्यातील वंशजांनी त्यांच्या घरी बनवलेला प्रसाद महाप्रसाद म्हणून वाटप केला जातो. याचवेळी मंदिरातील गणमठावर सर्व खर्गेमहाराज बसलेले असतात. तेथेही शेटे हे मोहोळकर यांना खर्ग, गण कधी हे विचारतात, नंतर मोहोळकरांनी सांगितल्यावर शेटे पुन्हा मोठ्याने खर्ग, गण कधी हे मोठ्याने सांगतात. मग या ठिकाणी महाप्रसाद वाटला जातो.
खर्गे महाराजांच्या घरी आलेल्या सर्व मोहोळकरांना ताक, पाणी, फलाहार दिला जातो. त्यानंतर खर्गतीर्थ या ठिकाणी सर्व मानकरी सेवेकरी एकत्र येतात. यावेळी शेटे हे वडवाळ येथील सर्व मानकरी हजर असल्याची खात्री करून घेतात. नंतर शेटे हे मोहोळकरांना खर्ग, गण कधी हे विचारतात. मग मोहोळकर त्यांना सांगतात, मग शेटे मोठ्याने खर्ग, गण कधी हे सर्वांना सांगतात. यावेळी हेगरस घराण्याकडून आणलेल्या गंधाचे ताट शेटे घेतात व प्रथम मोहोळकर, कुर्डे यांना गंध लावतात. मग शेटे हाच गंध नंतर इतर सर्व मानकरी, सेवेकरी, भक्तांना लावतात. शेवटी पुन्हा मोहोळचे मानकरी शेटे, कुर्डे, वाले हे मोहोळकर यांच्याकडून महाप्रसाद घेतात. मग सर्वजण एकमेकांचा निरोप घेतात व तेल लावण्याच्या या सोहळ्याचा यावेळी समारोप होतो.