चैत्र महिन्यातील चैत्र कृ. अष्टमीचा हा दिवस होय. या दिवशी खर्गे महाराजांच्या घरी सर्व मानकरी, भाविक, ग्रामस्थ यांच्यासाठी दुपारी महाप्रसाद दिला जातो. दोन्ही खर्गमहाराज, संतमंडळी सायं. ५ वा. श्रींच्या मंदिरात येतात. खर्गेमहाराज अभंगास प्रारंभ करतात. मानकरी खांद्यावर पालखी घेतात, नंतर सर्वजण मंदिराबाहेर भजन म्हणत बाहेर पडतात. यावेळी रस्त्याच्या दतो संतमंडळी भजन म्हणत असतात. वेशीतून पालखी मार्गस्थ होत ओढ्याजवळच्या रस्त्यावर थांबते. याठिकाणी भाविक श्रींना नारळ फोडून मनोभावे दर्शन घेतात. नंतर सर्व संतमंडळी दर्शन घेतात. आरती झाल्यानंतर पालखी खांद्यावर घेऊन धावतच वडवाळ-मोहोळ पारंपारिक रस्त्याच्या दिशेने धावत निघतात.
नागचिंचच्या रस्त्यावर एक कट्टा आहे, त्यास विसावा म्हणतात. तिथे पालखी टेकविली जाते. खर्गेमहाराज श्रींच्या मूर्तीस उपरणे बांधतात.मग मानकरी व खांदेकरी खर्गेमहाराजांना पालखी श्रीक्षेत्र मोहोळकडे नेण्यासाठी परवानगी मागतात. खर्गेमहाराज त्यांना परवानगी देतात, मग लगेच तेथून पालखीला घेऊन धावत- पळत मोहोळकडे मार्गस्थ होतात. यावेळी वडवाळ येथील सर्व ग्रामस्थ, भाविक मोठ्या श्रद्धेने जड अंतःकरणाने पालखीस निरोप देतात.