Wadwal Nagnath

Our Festival

खर्ग

श्रीक्षेत्र वडवाळ येथील यात्रेमधील हा दुसरा मुख्य सोहळा. हा दिवस चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थीचा असतो. या दिवशी वडवळ येथील दोन्ही खर्गेमहाराज व त्यांचे सेवेकरी मोहोळ येथील मानकरी शेटे यांच्या घरी सकाळी ८ वाजता येतात. त्यांच्या घरातील देवघरामध्ये जाऊन दर्शन घेतात. विभूती लावतात व मोहोळ येथील श्री नागनाथ मंदिरात दर्शनासाठी जातात. तेथून पुन्हा शेटे यांच्या घरी येतात, तेव्हा तिथे मोहोळचे खर्गेमहाराज, वाले, कुर्डे हे उपस्थित असतात. या सर्वांचा पाहुणचार शेटे यांच्याकडून केला जातो. नंतर तेथून ही सर्व मंडळी मोहोळ येथील सर्व मानकरी, मान्यवर मंडळी यांना ‘खर्ग सोहळ्यासाठी वडवाळ येथे या’ असे आमंत्रण देण्यासाठी निघतात. सर्व मानकरी व मान्यवरांना प्रसाद म्हणून यावेळी खारीक, अंगारा, लिंबाची पाने, लिंबाचा फाटा दिला जातो. नंतर हेगरसांचे वंशज मोहोळकर यांच्या घरी केले जाते.

दुपारी धनगर देशमुखांच्या घरी महाप्रसाद असतो. या सर्वांच्या घरी महाप्रसाद, अन्य मानकरी भक्तांच्या घरी महाप्रसाद, अन्य मानकरी भक्तांच्या घरी महाप्रसाद घेऊन सर्व मंडळी दुपारी ४ नंतर शेटे यांच्या घरी येतात. तेथे त्यांना शेटे कुटुंबियांकडून शीतपेय दिले जाते. खर्गेमहाराज यांना विभूती व दावणा दिले जाते. नंतर दोन्ही खर्गेमहाराज यांना मोहोळच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी सर्व मानकरी येतात. यावेळी महिंद्रकर यांच्या दुकानातून शेटे हे खर्गेमहाराजांच्या गळ्यातील लिंग हातात बांधण्यासाठी तांबडे वस्त्र घेतात व नंतर खर्गेमहाराज वडवाळकडे मार्गस्थ होतात.रात्री ११ नंतर मोहोळ येथील नागनाथ मंदिरात सर्व मानकरी, सेवेकरी, संतमंडळी एकत्र जमतात व येथील श्री नागनाथांच्या पालखीचे वडवाळ येथील यात्रेसाठी मिरवणुकीकरिता प्रस्थान केले जाते. या पालखीसमोर मोहोळकर, शेटे, कुर्ड, वाले व इतर संतमंडळी अभंग म्हणत (सध्याची रविवार बाजाराची जागा) थांबतात. तेथून जाते व श्रींची पालखी खांद्यावर घेऊन सर्व भाविक धावत पळत निघतात. मोहोळ-वडवाळ हा पारंपारिक एक पालखी रस्ता आहे. त्याच मार्गे येतात.

रात्रीच्यावेळी धावताना त्यांना काट्या-कुट्याचे देखील भान नसते. वडवाळ येथे २० ते २५ मिनिटात खर्गतीर्थ येथे सर्वजण येतात. खर्गतीर्थाच्या पुढील बाजूस असलेल्या पालखीच्या कट्ट्यावर पालखी टेकविली जाते. नंतर मोहोळ येथील सर्व मानकरी, सेवेकरी हे खर्गतीर्थ येथे येतात. शेटे खर्गतीर्थामध्ये जाऊन मधोमध असलेल्या बिंड्यावर पाणी वाहून दर्शन घेऊन नागनाथ मंदिराकडे जातात. त्यानंतर मानकरी नरळे यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडील वस्त्र, आरती, दिवटी तयार आहे की नाही याची चौकशी करून खर्गेमहाराजांच्या घराकडे जातात. तेथून रात्री १ वाजता नागनाथ मंदिरात जातात व श्रींचे दर्शन घेतात व प्रवेशद्वाराजवळ येऊन उभारतात. त्यावेळी वडवाळ येथील मानकरी मोरे, धनवे, मोकाशी, नरळे, गोरे, चौगुले इत्यादी शेटे यांच्या पाया पडतात. नंतर शेटे हे सर्व मानकरी व भाविकांसोबत श्रींची पालखी मंदिरात आणण्यासाठी निघतात. यावेळी वाद्यांचा गजर केला जातो. ही सर्व वाद्ये मानकरी मोरे हे तयार ठेवतात. सर्वजण पालखीजवळ येतात. तेथे श्री. शेटे हे खारकेचा नैवेद्य दाखवून कापूर लावतात व पालखीसमोर येऊन उभारतात. यावेळी श्री मोहोळकर हे ‘अनादि सिद्ध पूर्ण’ हा अभंग लावतात. हा अभंग संपताच शेटे हे श्रींची पालखी उचलून मानकरी मोरे यांच्या खांद्यावर देतात. मग सर्वजण भजन म्हणत मंदिराकडे निघतात. यावेळी श्री. कुर्डे हे अभंग लावतात. या मार्गावर वडवाळ येथील भाविक पालखीची आरती करतात.

यावेळी वडवाळ येथील अनुसूचित जातीच्या लोकांना शोभेचे दारुकाम करण्याचा मान असतो. ते दारुगोळा उडवीत पालखी समोर असतात. नंतर पालखी मंदिरात प्रदक्षिणा करून गुरुगादी व एकलिंग तेली यांच्या समाधीच्या डाव्या बाजूस शेटे यांच्याकडून टेकवली जाते. मात्र अभंग अखंडपणे सुरूच असतो. रात्री २ वाजता मोहोळकर, कुर्डे, शेटे, वाले व इतर मानकरी हे सर्व गाभाऱ्यातील श्रींच्या मोठ्या मूर्तीस मानाचा आहेर करण्यासाठी जातात. यावेळी मानकऱ्यांच्या मार्फत श्रींस आहेर केला जातो. सर्व मानकऱ्यांना पुजाऱ्यांकडून प्रसाद वाटला जातो. २.३० वाजता मानकरी शेटे हे जहागिरदार संस्थान मानूर जिल्हा बीड येथील मानूरकर महाराज यांनी नेमलेल्या स्वामींना (सध्या अनगर, ता. मोहोळ) आणण्यासाठी निघतात. मंदिराच्या बाहेर ठराविक अंतरावर हे स्वामी बसलेले असतात. त्यांना वाजत-गाजत २.५० वा. मंदिरात आणतात व गुरुगादी या ठिकाणी त्यांना मानाने बसवतात व दर्शन घेतात. पहाटे ३.०० वा. शेटे हे खर्गेमहाराजांच्या घरी जातात. या ठिकाणी (रात्री ८ वा. श्रींची लहान मूर्ती खर्गेमहाराजांच्या घरी आणलेली असते. त्यानंतर सुवासिनींच्या उपस्थितीत गडंगनाचा सोहळा संपन्न होतो. यावेळी खर्गे महाराजांच्या घरातील नैवेद्य श्रींना दाखविला जातो.)

आल्यानंतर मानकरी धनवे यांना दिवटी लावण्यास सांगतात. श्रींच्या मूर्तीचे पूजन शेटे करतात. त्यानंतर खर्गेमहाराजांना दर्शनासाठी ते बोलावतात. त्यानंतर शेटे हे मूर्तीचे दर्शन घेऊन मूर्तीच्या उजव्या बाजूस धरतात.डाव्या बाजूस खर्गेमहाराजांच्या घरातील शिवपुजे घराण्यातील व्यक्ती धरते व मूर्ती वाजत-गाजत मंदिरात आणली जाते.त्यानंतर शेटे हे मानकरी धनगर-देशमुख यांच्याकडे नाभिक, परीट आले आहेत का ? याची चौकशी करून खर्गेमहाराज यांना मंदिरात आणण्यासाठी ३.१५ वा. निघतात. घरी आल्यानंतर त्यावेळी खर्गेमहाराज स्नान करून त्यांच्या शरीरावर धारण केलेल्या शिवलिंगाचे पूजन करतात. यावेळी मानकरी शेटे उपस्थित असतात. तेथे सर्व संतमंडळी दर्शन घेतात. शेटे हे खर्गेमहाराजांचे दर्शन घेतात, त्यानंतर खर्गेमहाराज शेटे यांच्या उजव्या खांद्यावर हात ठेवतात. खर्गेमहाराजांना उजव्या बाजूस शेटे धरतात. डाव्या बाजूस मोरे घराण्यातील व्यक्ती असते. यावेळी खर्गेमहाराज त्यांच्या मातोश्रींच्या पाया पडतात. मातोश्री आशीर्वाद देतात. मातृभक्तीला या नागेश संप्रदायात विशेष महत्त्व आहे. यावेळी खर्गेमहाराज यांना मंदिरात जाण्यासाठी वेध लागलेले असतात. त्यांना मंदिरात धावत नेले जाते.

प्रथम धानम्मा देवीच्या मंदिराच्या उजवीकडील बाजूस असलेल्या धनगर देशमुखांच्या ओवरीजवळ नेले जाते. तिथे अगोदरच धनगर देशमुख घोंगडी टाकून बसलेले असतात. तिथे खर्गेमहाराजांना नेण्यापूर्वीच शेटे यांनी ज्या खर्गेमहाराजाचे साल नाही त्यांना देखील वाजत-गाजत आणून बसवलेले असते. तिथे गेल्यानंतर धनगर देशमुख ज्याचे साल नाही त्या खर्गेमहाराजाना यावर्षी साल कुणाचे आहे ? कुणाची काही तक्रार आहे का? अशी विचारणा करतात. त्यावर ते खर्गेमहाराज सर्व बरोबर, योग्य असल्याचे सांगताच धनगर देशमुख ज्या खर्गेमहाराजाचे साल आहे त्यांच्या लगेच पाया पडतात व नंतर लगेचच खर्गेमहाराज यांना शेटे हे गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीसमोर आणून बसवतात. तेथे शेटे हे बारगजे यांना कापूर लावण्यास देतात व पाच खारका शेटे हे खर्गेमहाराजांच्या हातात श्रींना नैवेद्य दाखविण्यासाठी देतात. त्यानंतर खर्गेमहाराजांनी खारकेचा नैवेद्य दाखवल्यानंतर खर्गेमहाराजांना सभामंडपात आणले जाते. तेथे शेटे हे खर्गेमहाराजांच्या गळ्यातील लिंग हे लाल वस्त्रामध्ये बांधून खर्गेमहाराजांच्या हातात बांधतात.

त्यानंतर भक्त तिमण्णा धनगरास दिलेल्या वरानुसार त्याची आठवण म्हणून खर्गेमहाराजांना चोळणा घालण्यात येतो. त्यानंतर मोहोळ येथील नाभिकांच्या हातून खर्गेमहाराजांच्या डोक्याचे मुंडन केले जाते. शेटे हे धावत पळत लिंबाच्या माळा, पांढरी छत्री, मानकरी नरळेंची आरती आणण्यासाठी निघतात. या सर्वांना एकत्र घेऊन मंदिरात येतात. मंदिरात आल्यानंतर खर्गेमहाराजांचे मुंडन पूर्ण झालेले असते. त्यांना स्नान घालून मूर्तीसमोर बसविले जाते. त्यांना मानकरी करपे यांच्याकडून सर्वांगास भस्म लावले जाते. नंतर बुक्का लावला जातो. त्यानंतर नरळे घराण्यातील सुवासिनी खर्गेमहाराज व श्रींना ओवाळतात. नरळे यांच्याकडील वस्त्र शेटे हे वाले यांच्याकडे खर्गेमहाराजांच्या कमरेला बांधण्यासाठी देतात. नंतर लगेच नरळेंची आरती, दिवटी, प्रसाद घेऊन बाहेर आणली जाते. त्यानंतर शेटे हे लिंबाची माळ आणतात व खर्गेमहाराजांच्या गळ्यात घालतात. नंतर बारगजे हे चाफ्यांच्या फुलांच्या माळा खर्गेमहाराजांना घालतात. डोक्यावर याच फुलांचा टोप घातला जातो. बारगजे सर्व मानकऱ्यांना या फुलांच्या माळा घालतात.

यानंतर नैवेद्य म्हणून हेगरस घराण्याकडून प्रथम खर्गेमहाराजांच्या मुखात साखर घातली जाते. नंतर इतर भक्तांकडून साखर घातली जाते. यानंतर मुखशुद्धीसाठी वाले घराण्याकडून विडा दिला जातो. पूजा झाल्यावर आरती म्हणून हेगरस घराण्याकडून प्रथम साकी म्हटली जाते. या साकीचा उच्चार होताच खर्गेमहाराजांच्या शरीरात श्रींचा संचार होतो. हा श्रींचा संचार म्हणजेच श्री नागनाथ वायुरूपाने खर्गेमहाराजांच्या शरीरात प्रवेश करतात. हा सोहळा नेत्रदीपक असतो. नंतर इतर भक्त साकि क्रमाने म्हणतात. संचार झाल्यानंतर शेटे हे खर्गमहाराजाच्या पाया पडतात. ते पाया पडताच खर्गेमहाराज हातात खडग घेऊन आसनावरून उठतात.

मिरवणूक
खर्गेमहाराज हे आता श्री नागनाथांचेच रूप झालेले असतात. भक्त एकलिंग तेली याला दिलेल्या वरानुसार प्रथम त्याच्या समाधीवरून ते चालत जातात. (माझ्या मस्तकावर तुम्ही पाय द्यावा, असा वर भक्त एकलिंग तेली यांनी मागितला होता. भक्त एकलिंग तेली यांच्या समाधीवरील छत हे उंच नाही. त्यावरून चालताना वाकूनच जावे लागते. मात्र खर्गेमहाराज संचार अवस्थेत त्या समाधीवरून अत्यंत वेगाने कसे व कधी चालत जाऊन लगेच बाहेर येतात हे लवकर कुणाला समजत देखील नाही.) यावेळी खर्गेमहाराजांच्या डोक्यावर पांढरी छत्री कोळी घराण्याकडून धरली जाते. अबदागिऱ्या धरल्या जातात. एकलिंग तेली यांच्या समाधीवरून चालत आल्यानंतर खर्गेमहाराज प्रथम मानकरी नरळे यांच्या खांद्यावर आरूढ होतात व गुरुगादी या ठिकाणी जातात. तिथे बसलेले स्वामी हे खर्गेमहाराजांना भस्म लावतात, हे भस्म सध्या अनगर, ता. मोहोळ येथील स्वामी लावतात. नंतर मंदिर प्रदक्षिणा करीत मुख्य दरवाजामध्ये येतात. (या दरवाजाला दिल्ली दरबार असे म्हणतात.

इथे देशाच्या राजकारणासंबंधी केंद्र सरकारमधील सर्वोच्च व्यक्ति, महत्वपूर्ण घडामोडींविषयी भाकणूक केली जाते.) या दिल्ली दरबाराच्या मुख्य पायरीवर आल्यानंतर प्रचंड टाळ्यांच्या गजरात भाविक मनोभावे खर्गेमहाराजांचे दर्शन घेतात. यावेळी दोन्ही बाजूला असलेल्या संतमंडळींकडून जोरजोरात साकी म्हटले जाते. त्यांची साकी पूर्ण ऐकल्यावर खर्गेमहाराज आपली भाकणूक हातातील खडग, गळ्यातील माळा, टोप, हाताची बोटे, चेहऱ्यावरील हावभाव इत्यादीच्या सहाय्याने वर्तवितात. यानंतर भाविक टाळ्यांचा गजर करतात. समोर श्रींची पालखी मागे खर्गेमहाराज अशा स्थितीत येथून मिरवणुकीस प्रारंभ होतो. यानंतर मारुती मंदिराच्या शेजारी असलेल्या भक्त बहिरंभट यांच्या समाधीवर धान्यासंबंधीची भाकणूक होते. यावेळी साकी पूर्ण होताच भक्त भाराच्या हातात असलेल्या गाडग्यामधील खिचडा खर्गेमहाराज उधळतात. ते कसे व किती खिचडा उधळतात यावर भाकणूक असते. खिचडा उधळला तर धान्य भरपूर वाटले जाईल व झाकून ठेवले तर धान्यावर बंधने राहतील, अशा आशयाची भाकणूक केली जाते.

आकर्षक दारुकाम
गावातीलच अनुसूचित जातीच्या समाजाला यात्रेत शोभेचे दारुकाम करण्याचा मान आहे. या समाजातील सर्व तरुण यात्राकालावधीत ही सेवा मनोभावे करतात. पहाटे बहिरंभट येथे खर्गेमहाराजांचे आगमन झाल्यापासून भाकणूक संपवून खर्गेमहाराज मार्गस्थ होईपर्यंत या ठिकाणी आकर्षक शोभेचे दारुकाम केले जाते. अनेक तरुण कमीत कमी वेळेत जलद गतीने हे दारुकाम करीत असतात. यात्रा कालावधी असो की वर्षभरातील विविध उत्सवप्रसंगी हेच दारुकाम करीत असतात. यानंतर भक्त बहिरंभटांना ज्या ठिकाणी उखळात घालून कुटण्यात आले होते त्याठिकाणी खर्गेमहाराज येतात. त्याठिकाणी रोगराई, जीवितहानी याविषयी भाकणूक केली जाते. साकी म्हणून झाल्यानंतर त्या ठिकाणच्या उखळात पाय घातला तर रोगराई, जीवितहानी होईल, पाय घातला नाही तर होणार नाही अशा आशयाची भाकणूक असते.

गुरू-शिष्य भेटीचा सोहळा

यानंतर सर्वजण खर्गतीर्थाकडे जातात. याठिकाणी गुरु-शिष्य भेटीचा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी भाविक उपस्थित असतात. या खर्गतीर्थामध्ये मध्यभागी असलेल्या बिंड्यावर हेगरस घराण्याचे वंशज श्री. मोहोळकर, संत मंडळी आदी उपस्थित असतात. सर्वप्रथम खर्गेमहाराज खर्गतीर्थामध्ये आल्यानंतर विविध भक्त साकी म्हणतात. साकी पूर्ण होताच पाणी उडवून खर्गेमहाराज बिंड्याच्या उजव्या दिशेला असलेल्या ठिकाणी पोहत जातात. (यावेळी पाणी किती उडवले जाते, कोणत्या दिशेला उडवले यावर पावसाचे भाकित अवलंबून असते.) तिथे देखील साकी म्हटली जाते. त्यानंतर पुन्हा खर्गेमहाराज पोहत बिंड्याकडे येतात. (खर्गेमहाराज हे गुरु – हेगरसांचे वंशज शिष्य) आपल्या लाडक्या शिष्याची कडकडून गळाभेट घेतात. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा भाविक डोळ्यामध्ये साठवून ठेवतात. याप्रसंगी दोहोंवर पुष्पवृष्टी केली जाते. यावेळी संतमंडळी तल्लीन होऊन भजन म्हणत असतात. भाविक टाळ्या वाजवत असतात. त्यामुळे सर्व वातावरण नागेशमय होते.

शिष्याला भेट देऊन पुन्हा खर्गमहाराज बिंड्यावरून खाली उतरत बिंड्याच्या डाव्या दिशेला ‘गणपतीची मूर्ती’ असलेल्या ठिकाणी जातात. तिथे मानकरी मोकाशी हे खर्गेमहाराजांना आपल्या मांडीवर घेऊन साकी म्हणतात. साकी पूर्ण होताच पुन्हा खर्गेमहाराज खर्गतीर्थाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येतात. तिथे पुन्हा मानकऱ्यांच्या खांद्यावर बसून खर्गतीर्थाबाहेर येतात. पुन्हा बिंड्याकडे ते मुख करून थांबतात. यावेळी साकी होते. नंतर येथून ओढ्यालगत असलेल्या रस्त्यावरून मिरवणूक पुढे जाते. ठराविक अंतर गेल्यावर खरीप पेरणीसंबंधीची भाकणूक जमिनीवर बसून करतात. मातीत किती बोटे घालून कोणत्या दिशेने ती फिरवली यावर ते भाकित अवलंबून असते. ही भाकणूक झाल्यावर हेगरस घराण्यातील वंशजांची साकी ऐकण्यासाठी खर्गेमहाराज थांबतात. हेगरस घराण्यातील व्यक्ति ही साकी म्हणतात. याप्रसंगी या गुरु-शिष्यांच्या चेहऱ्यावरील भाव एकमेकांशी जणू संवाद करीत असतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो.

पुढे ‘मुंगीचा धोंडा’ या ठिकाणी श्रींची मिरवणूक येते. खर्गेमहाराज मुंगीच्या धोंड्यावर उभे राहतात. त्यांच्यासमोर क्षीरसागर घराण्यातील एक पुरुष लिंबाची छोटी ढाळ घेऊन उभा असतो. साकी म्हणून झाल्यावर खर्गेमहाराज तो लिंबाचा फाटा त्याच्या हातातून घेतात व तो फाटा फेकतात. जर फाटा मागे पडला तर जनावरांना चारा स्वस्त होईल व पुढे पडला तर चारा महाग होईल अशा प्रकारची ही भाकणूक असते. या मुंगीच्या धोंड्याजवळच भक्त तिमण्णा धनगर यांची संजीवन समाधी आहे. यानंतर हनुमान मंदिराकडे ही मिरवणूक निघते. तेथील वेशीतून मंदिराकडे जाताना असलेल्या चिंचेच्या झाडाखाली थांबतात. ह्याठिकाणी संत मंडळी व अन्य भाविक खर्गेमहाराजांच्या चरणावर मस्तक ठेऊन दर्शन घेतात, याला संतदर्शन असे म्हणतात. खर्गेमहाराज हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर त्यांची नागनाथ मंदिरामध्ये पुन्हा जाण्यासाठीची भेटीची आस खूपच पाहण्यासारखी असते. त्यांचा त्यावेळचा संचार अवस्थेतील स्थिती पाहण्यासारखी असते. भाविक हे पाहून कृतकृत्य होतात.

धान्याची भाकणूक (धारण)
श्रींच्या मिरवणुकीतील ही शेवटची भाकणूक असते. संतदर्शन झाल्यानंतर खर्गेमहाराजांना धावतच मुख्य मंदिराकडे नेले जाते. याठिकाणी मुख्य महाद्वाराच्या समोरील शिवपुजे यांच्या दुकानालगतच ही भाकणूक होते. ह्याठिकाणी शेटे घोंगड्यावर बसलेले असतात. त्यांच्यासमोर तूरदाळ, ज्वारी, मीठ असे ध्यान्याचे तीन लहान ढीग असतात. याठिकाणी खर्गेमहाराज आल्यानंतर शेटे साकी म्हणतात. ही साकी पूर्ण झाल्यानंतर खर्गेमहाराज हे धान्य मिसळतात. किती बोटांनी व कसे धान्य मिसळले, कोणत्या धान्यास प्रथम हात लावला, ते धान्य वाटले किंवा कसे फेकले यावर ही भाकणूक असते.

अलिंगन
या ठिकाणची भाकणूक झाल्यानंतर खर्गेमहाराजांना मंदिरामध्ये नेले जाते. गाभाऱ्यातील मूर्तीसमोर ते जाऊन बसतात व मोठ्या मूर्तीला अलिंगन देतात. हा सोहळा देखील डोळ्यात साठवून ठेवण्यसारखा असतो. मूर्तीला अलिंगन देत देत त्यांचा संचार शांत होतो. पहाटेपासून संचार अवस्थेत असणारे खर्गेमहाराज याचठिकाणी शांत होतात. यानंतर खर्गेमहाराजांना वाजत गाजत मुख्य महाद्वारामधून त्यांच्या घराकडे नेले जाते. यावेळी सर्वजण त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घेतात. घरी आल्यानंतर शेटे हे खर्गेमहाराजांच्या हाताला बांधलेले लिंग सोडतात व धान्याचा प्रसाद वाटण्यासाठी मंदिराकडे जातात. तेथे वाले हे खर्गेमहाराजांच्या गळ्यातील हार, टोप व चोळणा सोडतात व त्यानंतर खर्गेमहाराजांना गरम पाण्याने स्नान घातले जाते. यावेळी खर्गेमहाराजांना अंघोळ घालताना त्यांच्या अंगाखांद्यावरील पाण्यामध्येच लहान लहान मुलाना देखील स्नान घातले जाते. या लहान मुलांना हा खर्गेमहाराजांचा एक आशीर्वाद भेटतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आहेर व प्रसाद वाटप
खर्गेमहाराजांचे स्नान झाल्यानंतर मोहोळचे धनगर देशमुख हे खर्गेमहाराजांना आहेर करतात. यानंतर खर्गेमहाराजांना पाणी व दूध पिण्यासाठी दिले जाते. शेटे खर्गेमहाराजांच्या उजव्या बाजूस बसतात. येथे खर्गाची सांगता म्हणून खोबरे व चाफ्याचे फूल प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतो. प्रथम शेटे हे मोहोळ व वडवळ येथील सर्व मानकरी उपस्थित आहेत का, याची खात्री करून घेतात व मग प्रसाद वाटपास प्रारंभ होतो. शेटे हे मानकऱ्यांची नावे मोठ्याने व मानानुसार क्रमाक्रमाने घेतात. त्यानुसार हे मानकरी प्रसाद घेऊन खर्गेमहाराजांच्या पाया पडून बाहेर येतात. मोहोळ येथून आलेली श्री नागनाथांची पालखी भक्त एकलिंग तेली यांच्या समाधीच्या उजव्या बाजूस ठेवली जाते. तेथे मोहोळ येथील संतमंडळी आरती म्हणतात. पारंपारिक पद्धतीने प्रसाद वाटप होतो. प्रसाद वाटपानंतर ही पालखी मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील सभामंडपात ठेवली जाते. तेथून पुढील ‘गण’ या यात्रेच्या सोहळ्यापर्यंत ही पालखी याच ठिकाणी असते. यानंतर हेगरस यांच्या वंशजाकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो.