श्रीक्षेत्र वडवळ येथील यात्रेची प्रथा या बाराव्या शतकापासून सुरू आहेत. श्रींच्या वार्षिक यात्रेमधील सर्व विधी, कार्यक्रम हे प्रथेनुसार व विशिष्ट क्रमाने होतात. यातीलच एक सोहळा म्हणजे ‘कळस चढणे’ होय. श्रींच्या मंदिरावर एकदा कळस चढला की, गावातील सर्व पीठ गिरण्या, दळणे, कुटणे आदि यंत्रांची कामे बंद केली जातात. कोणतेही बांधकाम वा अन्य गोष्टी केल्या जात नाहीत. या कळसासंबंधीचे विधी पार पाडण्याचा मान धनवे-पाटील घराण्याला आहे. यात्रेमधील हा एक प्रमुख सोहळा असतो.
श्रींच्या वार्षिक उत्सवादरम्यान चैत्र शुद्ध दशमीला धनवे-पाटील, मोरे-पाटील व कुलकर्णी यांच्या घराण्यात ‘घटस्थापना’ केली जाते. धानम्मा देवीच्या मंदिरातदेखील घटस्थापना केली जाते. तिथे विधीवत पूजा-अर्चा केली जाते. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीला श्रींस तेल लागल्यानंतर सायंकाळी ४ वाजता मंदिरावरील ‘कळस’ उतरविला जातो व तो धनवे-पाटील यांच्या घरी ठेवला जातो. दोन्ही खर्गेमहाराजांना महाप्रसाद देण्यात येतो व त्यांचे दर्शन घेतले जाते. चैत्र कृष्ण तृतीया घटस्थापनेच्या आठव्या दिवशी कळसासमोर रात्रभर श्रींचे भजन केले जाते, यास जागर म्हणतात. नंतर पहाटे चार वाजता हा कळस खर्गतीर्थ येथे घेऊन जातात व तिथे या कळसास स्नान घातले जाते. यानंतर सर्व भाविक, महिला दंडवत घालत मंदिरात येतात. चैत्र कृष्ण चतुर्थी दिवशी हा कळस देव्हाऱ्याजवळ उभा केला जातो. या दरम्यान माळी समाजाकडून घटस्थापनेपासून चतुर्थीपर्यंत श्रींच्या कळसाला व घटाला फुले, हार पुरविले जातात. धनवे-पाटील घराण्यातील सर्व सुवासिनी या कळसाची मनोभावे पूजा करतात व हा कळस मंदिराकडे नेला जातो.
मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर गोरे मानकरी नैवेद्य व निशाण घेऊन येतात. वाद्याच्या संगतीने धनवे-पाटील घराण्यातील सर्व सुवासिनी या दिवशी गावातील सर्व ग्रामदैवतांना आरती व नैवेद्य दाखवितात. त्यानंतर गावात सर्वत्र पुजारी जेवू घालण्याचा कार्यक्रम होतो. यात्रा कालावधीत या धनवे-पाटील घराण्याकडे श्रींसमोर ‘दिवटी’ व ‘चवरे’ धरण्याचा मान आहे. ‘दिवटी’ हे उजेडासाठी व ‘चवरे’ ही श्रींना सतत कानाजवळ ‘वारा’ घालण्यासाठी असते.