वडवळ येथील यात्रेतील हा तिसरा मुख्य सोहळा ‘गण’ या नावाने ओळखला जातो. हा सोहळा दुपारी असतो. चैत्र महिन्यातील कृ. सप्तमीच्या दिवशी हा सोहळा असतो. यादिवशी मानकरी शेटे हे मोहोळहून पहाटे ५ वा. वडवळ येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शिवपुजे यांच्या शेतामध्ये सर्व भंडाऱ्याचे साहित्य घेऊन परिवारासह येतात. तेथील साफसफाई करतात. सर्व महिला स्वयंपाक करतात. देवपूजा झाल्यानंतर शेटे हे स्वयंपाकघरातील सर्व भांड्यांची पूजा करतात. त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन श्रींना नैवेद्य दाखवण्यासाठी आरती, दिवटी घेऊन जातात. तेथे श्रींची पूजा करून विभूती लावतात व दावना वाटतात. पुजाऱ्याकडून याप्रसंगी त्यांना नारळाचा प्रसाद देण्यात येतो. शेटे घराण्यातील सुवासिनी श्रीस आरती ओवाळतात व शेटे मोहोळच्या पालखीमधील श्रींची पूजा करतात. दिवटी ओवाळून नैवेद्य दाखवितात. त्यानंतर पुन्हा शिवपुजे यांच्या शेतात वडवळ, मोहोळ येथील खर्गेमहाराज, मानकरी यांना महाप्रसाद घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. यावेळी भोजन झाल्यानंतर औक्षण करून हळद लावली जाते. शेटे हे त्यांना पानसुपारी, दक्षिणा याचा विडा देऊन खर्गेमहाराजांचे दर्शन घेतात. यानंतर मानकरी वाले यांच्याकडे देखील हे सर्वजण महाप्रसाद घेण्यासाठी जातात.
दुपारी २ वाजता शेटे हे गणासाठी लागणारे सर्व साहित्य एका पिशवीत घेऊन शेतातील देवतेचे दर्शन घेऊन मंदिरात येतात. मोरे यांना झेंगट, आबदागिरी, वाजंत्री तयार आहे की नाही याची चौकशी करतात. त्यानंतर ते ‘शिवगण’ तयार आहेत की नाही हे पाहण्यासाठी धानम्मा मंदिराच्या उजव्या बाजूस जातात. त्याठिकाणी लिंगायत समाजातील सहा लहान मुलांना एकत्र केले जाते. मोहोळच्या नाभिक मानकऱ्यांकडून या मुलांचे मुंडन केले जाते. त्यानंतर त्यांना एकत्र स्नान घालून त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर शेटे लाल वस्त्रामध्ये लहान शिवलिंग घालून ते वस्त्र बांधतात व या सहा मुलांना आत गणमठावर आणून उभे केले जाते. त्यांना मानकरी करपे सर्वांगास भस्म लावून केळीचा प्रसाद देतात व विडा खाण्यास दिला जातो.
शिवगण
(लिंगायत समाजातील ही लहान सहा मुले असतात. त्यांचे मुंडन केल्यावर त्यांना ‘गण’ म्हटले जाते. या सर्व गणांना देखील खांद्यावर घेतले जाते. आता शिवगण होण्यासाठी गर्दी होते. एकदा शिवगण झाले की पुन्हा पुढच्या यात्रेत इतरांना संधी द्यावी, असा नियम आहे. प्रत्येक वर्षी, सलग तीन वर्षे ‘गण’ होणे याला काही महत्त्व नाही. त्यामुळे सर्वांना संधी मिळेल.) ही सर्व तयारी पाहून शेटे हे खर्गेमहाराजांच्या घरी येतात, तेथे तयार होतात. तेथील घरातील सदस्यांना शिधा तयार करण्यास सांगतात. दुपारी ३ वाजता शेटे हे यात्रा सोहळ्यास प्रारंभ करतात. ते मंदिरात येऊन संतमंडळी व वाजंत्रीसह लिंबाच्या माळा व पांढरी छत्री आणण्यासाठी खर्गेमहाराज यांच्या घरातील शिधा सूप घेऊन निघतात. प्रथम ते एक सूप माळी यांच्याकडे देतात व त्यानंतर गावातीलच पुलाजवळील रस्त्यालगत एक कुंभार ताटली घेऊन उभा असतो. त्याला एक शिधा सूप देतात. त्यास वारली घेऊन खर्गेमहाराजांच्या घरी पोहोच करण्यास सांगतात व पांढऱ्या छत्रीची पूजा करून लिंबाच्या माळाची पूजा करून सर्वांना एकत्रित करून मंदिराकडे निघतात.
मंदिरात आल्यानंतर शेटे हे मोहोळकर, कुर्डे, वाले, परीट हे आले की नाही हे पाहतात व नंतर खर्गेमहाराज यांना आणण्यासाठी त्यांच्या घराकडे वाजत गाजत जातात व खर्गेमहाराजांना ते मंदिरात घेऊन येतात. प्रथम खर्गेमहाराजांना गाभाऱ्यातील मूर्तीसमोर बसवले जाते. शेटे कापूर लावण्यास देतात व खर्गेमहाराजांना श्रींना नैवेद्य दाखविण्यासाठी खारका देतात. खर्गेमहाराज श्रींना हा नैवेद्य दाखवितात. त्यानंतर खर्गेमहाराजांना बाहेर आणले जाते. तेथे शेटे हे त्यांचा शिवलिंग खर्गेमहाराजांच्या हातामध्ये बांधतात. वाले हे खर्गेमहाराजांना चोळणा घालतात. त्यानंतर महाराजांना स्नान घातले जाते. आजच्या दिवशी मुंडन केले जात नाही.
खर्गेमहाराजांना गणमठावर मानकरी मोरे हे मांडीवर घेऊन बसतात. तेथे मानकरी करपे यांच्याकडून खर्गेमहाराज सर्वांगास भस्म लावले जाते. कुर्डे बुक्का लावतात, शेटे हे लिंबाची माळ घालतात, मोहोळकर साखर खाऊ घालतात. त्यानंतर इतर मानकरी साखर घालतात व पाणी दिले जाते. प्रथम श्री मोहोळकर साकी म्हणतात. त्यांची साकी होताच श्री शेटे हे खर्गेमहाराजांचे दर्शन घेतात. त्यावेळी खर्गेमहाराजांच्या आपले आसन सोडतात. त्यांना मुख्य मूर्तीसमोर बसवले जाते. तेथे संतमंडळी साकी म्हणतात. याठिकाणी शेटे त्यांचे दर्शन घेतात व खर्गेमहाराज आपले आसन सोडतात. या दिवशी खर्गेमहाराजांच्या हातात खड्ग नसते, मानकरी नरळे यांचे औक्षण नसते. नंतर खर्गातील सोहळ्याप्रमाणे खर्गेमहाराजांची मिरवणूक निघते. सोबत सहा शिवगण असतात.
खर्गाप्रमाणेच सर्व भाकणूक होते. खर्गतीर्थामध्ये गुरू- शिष्यांच्या भेटीचा सोहळा होतो. ठिकठिकाणी भाकणूक पार पडल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन मूर्तीस अलिंगन देऊन त्यांचा संचार शांत होतो. सर्व सोहळा हा खर्गाप्रमाणेच पार पाडला जातो. यात्रेतील गण या दिवशी खर्गे महाराजांच्या हातात खड्ग नसते. खर्ग हा सोहळा पहाटे असतो व गण हा सोहळा दिवसा असतो व या गणा दिवशी त्यांच्या समवेत शिवगण म्हणून सहा मूले भस्मस्नान करून डोक्यावर लिंबाची माळ घातलेली असते. हा यातील फरक होय.