श्रीक्षेत्र वडवाळ येथील या यात्रेला १२ व्या शतकापासून प्रारंभ झाला. या दिवशीच श्रींच्या वार्षिक यात्रेला प्रारंभ होत असतो. यात्रा कालावधीत तेल लावणे, खर्ग, गण हे महत्त्वाचे उत्सव होत असतात. या सर्व उत्सवांविषयी विस्तृत माहिती आपण घेणारच आहोत. मात्र श्रींच्या या यात्रेला प्रारंभ कसा झाला? याविषयी थोडक्यात ही माहिती :
नागेश संप्रदाय हा गुरु-शिष्याच्या अलौकिक प्रेमावर आधारित आहे. श्री नागनाथांनी आपल्या शिष्यांसोबत राहून, प्रसंगी विविध खेळ खेळत, लीला दाखवित या सर्व शिष्यांचे जीवन समृद्ध केले. या शिष्यांमधीलच भक्त हेगरस हे चंद्रमौळी (सध्याचे मोहोळ) येथील राहणारे. त्यांच्या निस्सीम भक्तीमुळेच श्री नागनाथ मोहोळ येथे आले व नंतर वडवाळ येथे आले. वडवाळ येथे आल्यानंतर त्यांचा शिष्य परिवार मोठ्या संख्येने वाढू लागला. श्रींनी आपल्या शिष्यांसोबत काही लोकोपयोगी खेळरूपाने खेळ खेळले. हे खेळ म्हणजेच श्रींनी आपल्या परमशिष्यांना प्रतिवर्षी होणाऱ्या यात्रेत भेट देण्याचे संकेत होते. श्रीक्षेत्र मोहोळ येथून देखील त्यांचा शिष्य परिवार नित्यनेमाने वडवाळ येथे येऊ लागला. आपल्या या सर्व प्रिय शिष्यांना एकत्रित करून त्यांनी सांगितले की, ‘लवकरच आपण आता अवतार समाप्ती करणार आहोत. मात्र मी प्रतिवर्षी यात्रेमध्ये वायुरूपाने तुम्हाला भेट देईन’ असा वर दिला. तुम्हा सर्वांचे मनोरथ पूर्ण होईल. जो मला अंत:करणापासून हाक देईल मी त्याच्या पाठीशी असेन असे सांगितले. श्रीक्षेत्र मोहोळ येथील शिष्यांना देखील वर देत सांगितले की, आता तुम्ही नित्य वडवळ येथे येण्याची गरज नाही. इथल्याप्रमाणेच मी मोहोळ येथे वायुरूपाने तुमच्या भेटीला येईन. तिथे देखील वार्षिक यात्रा सोहळा होईल. वडवळ व मोहोळ येथील आपल्या शिष्यांच्या भेटीसाठी श्री नागनाथांनी दिलेला हा वर म्हणजेच येथील यात्रेची ही सुरुवात होय.
त्यानुसार सर्व शिष्यांना वर दिले व त्यानुसार भेट देण्याचे वचन दिले. १२ व्या शतकापासून ही यात्रा अखंड सुरू आहे. (मात्र सन २०२० व २०२१ मध्ये कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे ही यात्रा झाली नाही. प्रथमच अशी यात्रा खंडित झाली.) शिष्य हेगरसांची गुरुदक्षिणा श्रींनी सर्व शिष्यांना आता आपण अवतार समाप्ती करणार असल्याचे संकेत दिले व तशी इच्छा प्रकट केली. सर्व भक्त शोकसागरात बुडाले. शिष्य हेगरस यांनी आता श्रींना गुरुदक्षिणा द्यावी या उत्कट भावनेतून आश्विन शुक्ल पंचमी या दिवशी खर्गतीर्थावर पूर्वेकडे तोंड करून धारदार शस्त्राने आपले शिरकमळ उतरवून श्रींना ओवाळले. ही अनोखी भक्ती पाहून श्रींचे मन देखील अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा सर्व शिष्यांना एकत्र करून सांगितले की, ‘जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत मी वायुरूपाने तुमच्या भेटीस येईन, असे वचन देत आपल्या अस्तित्वाची खूण म्हणून नागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात तूरभूजीवर आपले उजवे पाऊल उमटविले.
श्री नागनाथांनी येथील मंदिराचे पुजारी असलेल्या शिवपुजे घराण्याला खर्गे महाराजांचा मान दिला. या खर्गे महाराजांच्या शरीरात श्री नागनाथांचा वायुरूपाने संचार होतो व ते सर्व भक्तांना भेटी देत, भाकणूक वर्तवित यात्रा सोहळ्यात सहभागी होतात. श्री. नागनाथ हे खर्गेमहाराजांच्या शरीरात वायुरूपाने संचार करतात व पुढील सर्व विधी पार पाडतात. खर्गेमहाराज हे श्री नागनाथांचे प्रत्यक्ष रूप झालेले असतात. त्यांचे दर्शन घेऊन भाविक कृतकृत्य होतात. या यात्रेमध्ये विशिष्ट ठिकाणी खर्गेमहाराजांकडून भाकणूक वर्तविली जाते. भविष्यात काय घडेल ? हे जाणून घ्यायची मानवाची सहजप्रवृत्ती असते. दिल्लीचे राजकारण, अन्नधान्य, रोगराई, पाऊस, पीकपाणी, जनावरांचा चारा अशा प्रमुख गोष्टींवर आधारित ही भाकणूक असते.